जळगावमहाराष्ट्रराजकीय

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत हजारो बहिणींना मिळणार लाभ-पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव,दि-15/08/2024, जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या निम्न तापी प्रकल्पातील पाडळसी जलसिंचन योजना जिल्ह्यातील मंत्री, खासदार, आमदार यांच्या पाठपुराव्यामुळे ही योजना पूर्णत्वाच्या टप्यात आली आहे. तसेच वाघूर प्रकल्प उपसा सिंचन प्रणालीच्या टप्पा क्रमांक 1 व 2 ला मान्यता मिळाली असून वरखेड लोंढे आणि शेळगाव बॅरेजलाही मान्यता मिळाल्यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी ओलीताखाली येणार असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.
भारताचा 78 वा स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित मुख्य शासकीय कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थितांना शुभेच्छा देताना त्यांनी जिल्ह्यातील विकासकामांचा आलेख मांडला.
यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद , जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, जळगाव शहर महानगरपालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे , सहायक जिल्हाधिकारी ( प्रशिक्षणार्थी) वेवोतोलू केझो, अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, विविध शासकीय विभागांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.
शासनाकडून नारीशक्तीचा सन्मान
पालकमंत्री गुलाबराव पाटील आपल्या संदेशात म्हणाले, नारीशक्तीच्या सन्मानासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली असून या योजनेतून प्रत्येक कुटुंबातील दोन महिलांना दरमहा दीड हजार रुपये म्हणजेच एका वर्षात 18 हजार रुपयांचा लाभ दिला जाणार आहे. जळगाव जिल्ह्यातील सुमारे 5 लाख 34 हजार बहिणींनी या योजनेसाठी अर्ज केले आहेत. पात्र बहिणींच्या बँक खात्यावर लवकरच जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकूण 3 हजार रुपये जमा केले जाणार आहेत. तसेच प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थी महिला आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या ज्या महिलांच्या नावावर घरगुती गॅस जोडणी आहे, अशा महिलांसाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून दरवर्षी 3 गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत. त्याच बरोबर मागासवर्ग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींना मोफत व्यावसायिक उच्च शिक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे हजारो युवतींचे फक्त पैशामुळे उच्च शिक्षण थांबणार नाही याची पुरेपुर काळजी शासनाने घेतली आहे. युवक, युवतीचे पुढचं भवितव्य घडविण्यासाठी कौशल्य व आर्थिक ताकत निर्माण व्हावी म्हणून राज्य शासनाने मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना सुरु केली आहे. यासाठी जळगाव जिल्हयात आतापर्यंत विविध आस्थापना, कंपन्याकडून 4630 पदे अधिसुचित झाली आहेत. उमेद‌वारांकडून ऑनलाईन नोंदणी सुरु आहे. संबंधित आस्थापनांकडून रुजू आदेशाची कार्यवाही सुरु आहे.
ज्येष्ठ नागरिकांची काळजी
शासनाने जेष्ठ नागरिकांसाठी नावीन्यपूर्ण अशी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरु केली असून यासाठी ज्यांना 60 वर्षे पूर्ण झाली आहेत अशा ज्येष्ठ नागरिकांना 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येणार आहे. याबरोबर शासनाने जेष्ठ नागरिकांना आधार देण्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरु केली असून या योजनेअंतर्गत जिल्हयात आतापर्यंत 17485 लाभार्थी पात्र ठरले आहेत. या योजनेसाठी 65 वर्ष, पूर्ण झाली आहेत. अशा जेष्ठ नागरिकांना अर्ज करता येणार असल्याची माहितीही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिली.

आरोग्य व्यवस्था बळकटीकरण जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थे बाबत बोलताना पालकमंत्री म्हणाले, जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात मोठी कामं झाली आहेत. त्यात आरोग्य हा अत्यंत महत्वाचा विभाग आहे, शेतकरी, शेतमजूर, गोर-गरीब जनतेच्या आरोग्याला संजीवनी देणाऱ्या जिल्हा सर्वसामान्य रुग्णालयाला गेल्या दोन वर्षात 40 कोटी पेक्षा अधिक आणि वैद्यकीय महाविद्यालयाचे रुग्णालयात अत्याधुनिक यंत्र सामुग्रीसाठी दोन वर्षात 47 कोटी पेक्षा अधिकचा निधी जिल्हा नियोजन मधून दिल्यामुळे हे रुग्णालयं अद्यावत झाली आहेत.
पीक विम्याच्या पैशाचा हातभार
शेतकरी हा आपला अन्नदाता आहे. महाराष्ट्र शासनाने नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. सन 23-24 या खरिप हंगामात स्थानिक आपत्तीमुळे 2 लाख 49 हजार 488 शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले होते त्याच्या भरपाई पोटी 132 कोटी 74 लाख एवढी रक्कम पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली. तर उत्पन्नावर आधारित 3 लाख 87 हजार 973 शेतकऱ्यांना 523 कोटी 28 लाख मंजूर झाले असून संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची कार्यवाही सुरु असल्याची महिती पालकमंत्र्यांनी आपल्या संदेशात दिली.
जिल्ह्यात 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत विविध कार्यक्रम आयोजित करून देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या वीरांना वंदन केल्याचे सांगून महसूल प्रशासन हा शासनाचा, प्रशासनाचा कणा आहे. सर्व सामान्यांची छोटी छोटी कामं साध्या साध्या प्रमाणपत्रासाठी अडलेली असतात. याची जाणीव ठेवून जिल्हा महसूल प्रशासनाने 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या पंधरवाड्यात महसूल पंधरवाडा मोठ्या उत्साहात साजरा केला, त्यात प्रत्येक दिवशी एक विषयासाठी विशेष शिबीर घेवून लोकांची प्रलंबित कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगून यासाठी जिल्हा प्रशासनाचे पालकमंत्र्यांनी कौतुक केले.
ई – चावडी प्रकल्पात विभागात जिल्हा प्रथम
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव जिल्ह्याने सर्व गावांची 100% मागणी ई चावडी प्रणाली मध्ये नोंदणी केली त्यामुळे ई -चावडी अंमलबजावणी मध्ये नाशिक विभागात जळगाव जिल्हा प्रथम क्रमांकावर आला, शेतकरी बांधवांच्या अत्यंत उपयुक्त प्रकल्पासाठी उत्कृष्ट कार्य केल्या बद्दल जिल्हाधिकारी व महसूल प्रशासनाचे विशेष अभिनंदन केले. पोलीस प्रशासनाच्या बळकटी करणासाठी दिलेल्या निधीचा उल्लेख करून कायदा व सुव्यस्था अधिक मजबूत होणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. तसेच सर्वांच्या सहकार्याने जिल्ह्याचा गौरव वाढवित राहण्याची ग्वाही देऊन स्वातंत्र्य दिनाच्या सर्व जिल्हावासियांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपूर्वा वाणी यांनी केले.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button